मानवतेचे पुजारी – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी महाराज

लेख

प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर

आज आनंदऋषिजींची 34वी पुण्यतिथी होत असताना अनेक आठवणी, अनेक विचार मनात गर्दि करून येत आहेत. माझ्या ८४ वर्षाच्या जीवनात चार महापुरूष येऊन गेले… त्यांचे सानिध्य मला लाभले… आनंदऋर्षिच्या तर घरातच माझा जन्म झाला, माझ्या बालपणी त्यांचं सान्निध्य मला लाभले…. त्यांचा प्रसाद मला लाभला, त्यांच्या मांडीवर मी निद्राधीन होत असे… ते ही आठवंत… मी दोनेक वर्षांचा असेन… आनंदऋर्षिचा वर्षावास पाथर्डीला होता… आई मला रोज त्यांच्याकडे घेऊन जात असे… आनंदऋर्षिजींनी एकदा माझा तळवा हाती धरला… व ते सहज म्हणून गेले, “”हा हुशार आहे… शिकेल व प्रोफेसर होईल”… त्यांचे शब्द नंतरच्या काळात खरे झाले… आनंदऋषिंचा वर्षावास जेथे होई तिथं मी गेल्याचे चांगले स्मरते… पाथर्डी,अहमदनगर,पुणे, घोडनदी, वांबोरी, आश्वी, चांदा ही गांवे तर चांगलीच लक्षात राहिली… नंतरच्या काळात मी त्यांचेशी चर्चा करीत असे… गुणांचा नम्र विचार आनंदऋषीजी करीत असत. निखळ, उज्ज्वल विचारांचा सखोल आशय त्यामागे असले पाहिजे.आनंदऋषीजींचे जीवन हे अत्यंत प्रेरणादायी, परोपकारी व प्रयत्नवादाला प्रतिष्ठीत करणारे आहे.
मोठ्या माणसांचा जन्म लहान गावात होत असतो, असे म्हटले जाते. जगातील बहुतेक मोठी माणसे एखाद्या खेड्यातच जन्माला आली आहेत. म. गांधींचा जन्म पोरबंदरचा, अब्राहम लिंकनचा जन्म लिंकन नावाच्या एका खेड्यामधला, तर विनोबा भावे यांचाही जन्म नागोडे नावाच्या महाराष्ट्रातील एका खेड्यातलाच ! आचार्य आनंदऋषी ह्यांचेही तसेच ! नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यांतील शिराळ-चिंचोंडी हे आनंदऋषीचे जन्मगाव ! श्री देवीचंदजी गुगळे व श्रीमती हुलासाबई हे त्यांच्या पित्याचे व मातेचे नाव ! नेमिचंद्र हे आनंदऋषीचे मूळ नाव. त्यांना एक भाऊ व एक बहीण. अगदी सुरुवातीस त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चिचोंडी या गावांत चालत होता.
नेमीचंद्रची बुद्धी लहान वयातच प्रगल्भ बनत चालली होती. त्यांचे सर्व सवंगडी जेव्हा खेळण्यात मग्न असत तेव्हा हा भजन-कीर्तन करण्यात लीन होई. गावांत आलेल्या प्रत्येक साधूकडे त्यांची उठबस असे. संतसमागम, भजन-कीर्तन, प्रवचन श्रवण यातच त्यांचा वेळ निघून जाई. नेमीचंद्र स्वत: गाणी गात असे. त्याचा गळा अत्यंत सुरेल होता. खेड्यातल्या एखाद्या समारंभात तो गाणी व भजन म्हणे. शिराळ हे गाव पाथर्डीपासून जवळच १३ मैलांवर वसलेले. ते पाथर्डीलाही अधूनमधून येत. पाथर्डी हे गाव तालुक्याचे असले, तरी तेथे बुधवारचा आठवडा बाजार अलोट गर्दीत भरे.
लहान वयातच नेमिचंद्रची प्रवृत्ती आध्यात्मिक बनत चालली होती. एकदा त्यांचे वडील अत्यंत आजारी पडले. त्यावेळी खेड्यापाड्यात कसली आली आहे औषधउपाय योजना ? वडील दुखण्यांत रात्र-रात्र ओरडत ! आपण काहीच करू शकत नाही, हे पाहून नेमिचंद्र हैराण होई. त्यांची मुळातच असलेली वैराग्य वृत्ती अशावेळी धारदार बने. या नश्वर जीवनात काहीच शाश्वत नाही, असे त्यावेळी त्यांना वाटे. एकदा गावात जैन मुनी रत्नमुनी महाराज आले होते. नेमिचंद्र त्यांच्याकडे रोज जाई. अध्यात्म, धर्म, ईश्वर, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय यांच्याविषयी ते त्यांच्याकडून माहिती करून घेत.
नेमिचंद तरूण वयांत आले होते. त्यावेळची गोष्ट. मुलगा आध्यात्मवृत्तीचा असला, तरी दुकानांत बसतो व सदाचारी म्हणून अनेक मुली सांगून येऊ लागल्या. त्यांच्या आई-वडिलांनाही नेमिचंद्रने आता लग्न करावे, असे वाटे. नेमिचंद्राला त्याविषयी एकदा त्यांनी विचारले. ते म्हणाले, “आई, माझ्या धाडसाबद्दल क्षमा कर, पण मी लग्न न करता आजीवन ब्रह्मचर्यव्रताचे पालन करायचे ठरवले आहे. लग्न तर काय, सर्वच करतात. साधू मात्र एखादाच बनतो. मला आपल्या जैन धर्माची उपासना करायची आहे.’ मुलाचे ते उद्गार ऐकून आईला आश्चर्याच वाटले. मुलांची वैराग्यवृत्ती त्यांना कळून आली.
रत्नऋषी महाराज चिचोंडीला आले त्यावेळी नेमिचंद्रने त्यांच्याकडून सामायिक प्रतिक्रमणाचा विधी शिकून घेतला. जवळ जवळ दीड-दोन तास मांडी घालून दररोज हे सूत्र कंठस्थ करावयाचे असते. नेमिचंद्रजी चिचोंडीहून मिरीला आले. तेथेही रत्नऋषींचा चातुर्मास दुसऱ्या वर्षी होता. नेमिचंद्रने जैन धर्माचा सर्वांगीण अभ्यास त्या काळात पूर्ण केला. उतारेच्या उतारे अर्थासह कंठस्थ केले. पाली व अर्धमागधी भाषेबरोबरच संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्या भाषेतील अनेक ग्रंथ वाचले. अहिंसा, प्रेम, दया, अपरिग्रह या जैन धर्मातील अनेक सूत्रांचा नेमिचंद्रावर सखोल प्रभाव पडला. रत्नऋषिंनी त्यांचया आई-वडिलांच्या सल्ल्याने व सर्व संमतीने दिक्षा देण्याचे योजिले.
मार्गशीर्ष शुक्ल नवमी विक्रम संवत १९७० मध्ये वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी नेमिचंद्रने जैन धर्माची दीक्षा मिरी या गावी रत्नऋषींच्या कडून घेतली. नेमीचंद्राचे नाव बदलून आनंदऋषी हे नवे नामाभिधान त्यांना लाभले व साधना पथावर त्यांचे मार्गक्रमण सुरू झाले. रत्नऋषीजी त्यांच्या विशुद्ध आचरणाने प्रभावित झाले. त्यावेळी वरखंडीला पं. कृष्णाजी नावाचे एक संस्कृत विद्वान होते. रत्नऋषींनी त्यांना पाचारण केले व आनंदऋषींना संस्कृतातील मर्म शिकविण्याची इच्छा व्यक्त केली. केवळ दोन महिन्याच्या अवधीत संस्कृतमधील शब्द रूपावली, धातू, रूपावली, समासचक्र आणि रघुवंशाच्या दोन सर्गाचे अध्ययन आनंदऋषींनी त्यावेळी करून दाखविले. त्यानंतर बनारसहून व्यंकटेशशास्त्रींना पाचारण करण्यांत आले. त्यांनी आनंदऋषींना लघुकौमुदी व किरातार्जुनीयच्या दुसऱ्या सर्गाचे अध्यापन केले. त्यानंतर काशीहून आणखी एक विद्वानाला बोलावले गेले. व्हायचे काय की जे जे विद्वान आनंदऋषींना प्रदीर्घ काल शिकविण्यासाठी यायचे, आनंदऋषींची ग्रहणशक्ती पाहून रत्नऋषींनी त्यांना विद्येचे माहेरघर पुणे येथे नेण्याचे ठरवले व ते पुण्यास आले.विक्रम संवत् १९८४ च्या ज्येष्ठ महिन्यांत कृष्ण सप्तमीच्या दिवशी रत्नऋषींजींची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. आपल्या परमप्रिय गुरुदेवांच्या वियोगाने आनंदऋषी एकटे पडले. त्यावेळेस त्यांचे वय २७ वर्षांचे होते. दीक्षाग्रहण होऊन १४ वर्षे झाली होती. या चौदा वर्षांत त्यांनी ज्ञानाच्या सर्व दालनातून गुरूपदेशाप्रमाणे मुक्त विहार केला होता.
आनंदऋषींनी मराठी-हिंदी पुस्तके जशी लिहिली, तसेच त्यांनी त्याकाळी हेही ओळखले होते की, जैनांच्यासाठी ज्ञानाचा मार्ग खुला करायचा असेल, त्यांना शिक्षित करावयाचे असेल तर काही संस्थाही आता उघडायला हव्यात. पाथर्डीत त्यांनी रत्न जैन पुस्तकालयाची स्थापना केली. नागपूर येथे जैन धर्म प्रचारक संस्था उघडली. श्री. तिलोक जैन विद्यालय व अमोल जैन सिद्धांत शाळेची स्थापनाही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर पाथर्डीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अखिल भारतीय जैन धार्मिक परीक्षा बोर्ड स्थापून, त्याच्या कार्याला सुरुवात केली. संबंध भारतात आजही ही संस्था जैन धर्माचे शिक्षण व परीक्षा घेण्याचे काम करते आहे.
मुंबईची अमोल जैन पाठशाळा, बोदवड (नासिक) ची रत्नजैन बोर्डिंग, पुण्याची महावीर जैन पाठशाळा, चिचोंडीचे महावीर वाचनालय, राजस्थानमधील स्थानकवासी जैन छात्रालय, श्रीरामपूरची रत्न जैन श्राविका, पंजाबच्या फरीदकोट येथील जैन सिद्धांत शाळा या अशासारख्या २५ संस्थांना आनंदऋषींनी ऊर्जितावस्था दिली. संस्था शिक्षणाची खरी गरज समाजामध्ये आहे हे आनंदऋषींनी ओळखले. १९९९ विक्रम संवत मध्ये जेव्हा आचार्य देवजी ऋषींचे महानिर्वाण झाले. तेव्हा साधूसंघाने आनंदऋषींना “आचार्य’ हे पद देण्याचे ठरविले. वांबोरी, जि. नगर येथे त्यावेळी त्यांचा चातुर्मास होता. त्यानंतर ७ वर्षांनी म्हणजे संवत २००६ मध्ये राजस्थानातील ब्यावर येथे जैन धर्मातील पाच संप्रदायांचे शिखर संमेलन झाले होते. त्या संमेलनात सर्व संमतीने “आचार्य’ म्हणून आनंदऋषींना पुन्हा निवडले व हे त्या संघाचे “मंत्री’ झाले. आत्मारामजी महाराज त्यावेळी प्रधानाचार्य होते. त्यानंतर तीनच वर्षांनी म्हणजे विक्रम संवत २००९ मध्ये सादडी येथे झालेल्या साधू संमेलनात आचार्य आनंदऋषींना “आचार्य सम्राट’ म्हणजेच प्रधानाचार्याचे पद मिळाले. आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत ते हे पद भूषवीत राहिले.
आनंदऋषींच्या दर्शनार्थ भारतातील तमाम प्रांतामधून जैन व जैनेतर लोक अहमदनगरला येत व त्यांचा उपदेश ग्रहण करीत. आपल्या जीवनांतील सुरुवातीचा व नंतर शेवटचा काही भाग त्यांनी अहमदनगरला जणू दिला होता. मधल्या ५० वर्षात त्यांनी भारताची पायी भ्रमंती केली. खानदेश, विदर्भ, राजस्थान, मुंबई, मेवाड, माळवा, मध्यप्रदेश, पंजाब, जम्मूतावी, उत्तरप्रदेश या भागांतील अनेक शहरांत त्यांनी चातुर्मास केला व तेथील लोकांना जैन धर्मातील विश्वव्यापक दर्शन घडविले. हर्षमुनी, प्रेमऋषी, मोतीऋषी, ज्ञानऋषी, कुंदनऋषी, चंद्रऋषी, हिम्मतऋषी, रतनमुनी हे त्यांचे प्रमुख शिष्य. आनंदऋषींनी आपल्या अमोघ वाणीने व प्रभावी व्यक्तिमत्त्वाने जैन व जैनेत्तर लोकांवर आपला अमीट प्रभाव टाकला. म्हणूनच त्यांचे जीवन महाराष्ट्रातील आधुनिक संतांच्या शृंखलेत अग्रक्रमाने तळपत राहिले व भविष्यकाळातही त्यांच्या अमोघ कार्याला तोड असणार नाही असे वाटते. अभ्यास, चिंतनशीलता, अध्यात्मवृत्ती, वैराग्यभावना आणि उत्कृष्ट कवि आणि वक्ता यांमुळे भारतातीलच नाही तर परदेशातही त्यांचा लैकिक सतत वृद्धिंगतच होईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *